भविष्यात राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर काय? रोहित पवारांच्या उत्तराने राज्यातील राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवार यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत गेल्यास आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो, असे सूचक विधान केले.
Rohit Pawar’s reply sparks political discussions : अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात सुरू असेलल्या घडामोडींमध्ये आता आमदार रोहित पवार यांच्या एका वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात बोलताना रोहित पवार यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत गेल्यास आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो, असे सूचक विधान केले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
भाजपसोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, आमचा संघर्ष हा एका विचारांच्या विरोधात आहे. त्यामुळे जर अशी परिस्थिती निर्माण झाली, तर आतापर्यंत आम्ही जे बोलत आलो ते चुकीचं ठरेल. फक्त तडजोडीसाठी कुठलाही निर्णय घेतला गेला, तर तो लोक स्वीकारणार नाहीत. मात्र, याचवेळी त्यांनी त्यावेळी मी वेगळा निर्णय घेईल, असे विधान करत स्वतःची भूमिका स्वतंत्र असू शकते, असे संकेत दिले.
रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. अजितदादा शेवटच्या काळात या दोन्ही नेत्यांबाबत नकारात्मक पद्धतीने व्यक्त व्हायचे, असा दावा देखिव त्यांनी मुलाखतीत केला.
याच मुलाखतीत रोहित पवार यांनी एक कथित ऑडिओ क्लिपचे देखील उल्लेख केला. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात अजितदादांबाबत नकारात्मक चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला. ही क्लिप पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी ऐकल्याचं सांगत, गरज पडल्यास ती बाहेर आणू, असा इशारा देखील त्यांनी दिला.
दरम्यान बारामतीच्या राजकारणाबाबत बोलताना रोहित पवार यांनी आपण 2029 मध्ये कर्जाचे-जामखेडमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, बारामतीत अजितदादांच्या वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, विशेषतः भाजपसोबत जाण्याबाबतच्या त्यांच्या सूचक भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.